आज फाल्गुन वद्य अमावस्या !! मराठी माणसाला आजच्या दिवसाची गंभीरता माहित आहे . हिंदवी साम्रज्याचे निर्माता शिवराय ज्यांचे पिता होत त्या संभाजी महाराजांची आज पुण्यतिथी . इ.स.१६८९ च्या अमावस्येला आलमगीर औरंगज़ेबाने संभाजी आणि त्यांच्याबरोबर छंदोगामात्य कलश यांना वढु येथे आपल्या सुडबुद्धीचा परिणाम म्हणुन अत्यंत हाल हाल करुन लौकिकार्थाने या जगातुन संपवले.अर्थात संभाजी राजांच्या बलिदानाचा परिणाम हा एकुणात आलमगिराच्या अपेक्षे उलट झाला. १६८९ ते १७०८ तमाम मराठी सैन्याने मोगलांविरुध्द झुंज दिली आणि मराठी साम्राज्य टिकवलं . एकुणात ती विजिगिषु वृत्ती ही नमनासच पात्र आहे .
अर्थात इतर अनेक गोष्टींसारखे याच्या कारणामध्येही मतभेद आहेत की संभाजी महाराजानी धर्मबदलासाठी नकार दिल्यामुळे त्याना मारलं की केवळ मराठी साम्राज्य खालसा करण्याच्या आणि स्वराज्याची संपत्ती मिळवण्याच्या हेतुने मारले. सध्या "इतिहास" या विषयाची परिस्थितीच अशी झाली आहे की घटना काय सांगितली जात आहे यापेक्षा ती "कोण" सांगत आहे याकडे अधिक लक्ष दिलं जातंय. एक गोष्टं समजुन घेतली पाहिजे कि इतिहासाचा अन्वयार्थ लावताना तत्कालीन सर्व चौकटींचे बंधन हे अभ्यासकानी घालुन घेतलेच पाहिजे अन्यथा वर्तमानातले तात्कालिक फायद्याचे हिशोब इतिहासाच्या खांद्यावर बंदुक ठेवुन चुकवले जाणार असतील तर मग कालचक्र सर्वाना कधी ना कधी तरी संधी उपलब्ध करुन देतेच त्यावेळेला विरोधी विचारधारा ही परत थोपली ज़ाणारच एवढे भान असले तर बरे !!. मर्यादेयं विराजते !!